बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर सुनेत्रा पवार बारामतीतून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
“सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देणार नाही”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्याकडून सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही. महाविकास आघाडीचाही विचार याच दिशेने असेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा पक्ष सुनेत्रा पवारांच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही.
राहुरी पोटनिवडणुकीवरही भाष्य
बारामतीसोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की या जागेबाबत निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या चर्चेनंतर घेतला जाईल.
“राहुरीच्या जागेबाबत जयंत पाटील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेशी चर्चा करतील. आज किंवा उद्या महाविकास आघाडी त्याबाबत अंतिम निर्णय घेईल,” असे त्या म्हणाल्या.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र निवडणूक झालीच तर सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवू शकतात, असे संकेत दिले आहेत.
पुढील रणनीतीकडे लक्ष
सुप्रिया सुळे यांच्या घोषणेमुळे बारामती पोटनिवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असले तरी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरच अंतिम समीकरण स्पष्ट होणार आहे.
सुनेत्रा पवार खरोखरच निवडणूक लढवतात का किंवा दुसऱ्या उमेदवाराचे नाव पुढे येते का, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.